शुद्रांचा दर्जा कोणता , याबद्दलचे ब्राह्मण ग्रंथांंतील प्रमेय (भाग २)

               शुद्रांचा दर्जा कोणता , याबद्दलचे ब्राह्मण ग्रंथांंतील प्रमेय (भाग २)

                 

                                           (४)

                     

आपस्तम्ब धर्मसूत्र

(अ)  आपस्तंब धर्मसूत्र

एखाद्याने क्षत्रियाला ठार मारले तर त्याने पापक्षालनार्थ ब्राह्मणास एक हजार गाई दान द्याव्यात.

एखाद्याने जर वैश्याला ठार मारले असेल तर त्याने पापक्षालनार्थ ब्राह्मणाला शंभर गाई दान द्याव्यात.

एखाद्याने जर शूद्राला ठार मारले असेल तर त्याने पापक्षालनार्थ ब्राह्मणाला दहा गाई द्याव्यात. (प्रश्न १, पाताळ ९, खंड २४, सूत्रे १-३).

         

गौतम धर्मसूत्र

(ब) गौतम धर्मसूत्र

      क्षत्रियाने ब्राह्मणाला शिवीगाळ केली तर त्या क्षत्रियाला शंभर पणांचा दंड करावा.

क्षत्रियाने ब्राह्मणाला मारहाण केली तर त्याला दोनशे पणांचा दंड करावा.

वैश्याने ब्राह्मणाला शिवीगाळ केली तर वैश्याला दीडशे पणांचा दंड करावा.

परंतु ब्राह्मणाने क्षत्रियाला शिवीगाळ केली तर ब्राह्मणाला पन्नास पणांचा दंड करावा.

ब्राह्मणाने वैश्याला शिवीगाळ केली तर ब्राह्मणाला पंचवीस पणांचा दंड करावा.

ब्राह्मणाने शूद्राला शिवीगाळ केली तर त्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा करू नये.”

(प्रश्न १, पाताळ ९, खंड २४, सूत्रे १-३)


(क) बृहस्पती धर्मसूत्र

    "ब्राह्मणाने क्षत्रियाला शिवीगाळ केली तर त्या ब्राह्मणाला पन्नास पणांचा दंड करावा; त्याने जर वैश्याला शिवीगळ केली तर त्याला पंचवीस पणाचा दंड करावा; आणि त्याने शूद्राला शिवीगाळ केली तर त्याला साडेबारा पणाची शिक्षा करावी.

 शूद्राला जो शूद्र आपल्या धर्मानुसार वर्तन करतो त्याला जर ब्राह्मणाने शिवीगाळ केली, तरच या बाबतीत सांगितलेली शिक्षा ब्राह्मणाला देता येते. पण जर तो शूद्र शुद्धाचरणी नसेल तर अशा शूद्राला ब्राह्मणाने शिवीगाळ केली तर तो ब्राह्मणाचा गुन्हा होत नाही."

(अध्याय २०, श्लोक ७-११).

 

मनुस्मृती

(ड) मनुस्मृती

      "क्षत्रियाने ब्राह्मणाला शिवीगाळ केली तर क्षत्रियाला शंभर पणांचा दंड केला पाहिजे. वैश्याने ब्राह्मणाला शिवीगाळ केली तर वैश्याला अडीचशे पणांचा दंड करावा परंतु शूद्राने ब्राह्मणाला शिवीगाळ केली तर शूद्राला देहदंडाची शिक्षा दिली पाहिजे.

      ब्राह्मणाने क्षत्रियाचा अपमान केला तर ब्राह्मणाला पन्नास पणांचा दंड करवा, ब्राह्मणाने वैश्यांचा अपमान केला तर त्याला पंचवीस पणांचा दंड करावा. ब्राह्मणाने शूद्राचा अपमान केला तर त्याला बारा पणांचा दंड करावा." (अध्याय ८, श्लोक २६७-६८)

ब्राह्मणाने ब्राह्मणाला ठार मारले तर त्याचे सर्व तपःसामर्थ्य नष्ट झाले असे समजावे.

ब्राह्मणाने क्षत्रियाला ठार मारले तर त्याचे एक चतुर्थांश तपःसामर्थ्य नष्ट झाले असे समजावे.

ब्राह्मणाने शूद्राला ठार मारले तर त्याचे एक अष्टमांश तपःसामर्थ्य नष्ट झाले असे समजावे.

ब्राह्मणाने शूद्राला ठार मारले तर, तो शूद्र जर शुद्धाचरणी असेल तर, त्या ब्राह्मणाचे एक सोळांश तपःसामर्थ्य नष्ट झाले, असे समजावे.

परंतु जर ब्राह्मणाने क्षत्रियाला अनैच्छिकपणे ठार केले तर पापक्षालनार्थ त्या ब्राह्मणाने एक हजार गाई व एक बैल यांचे दान (वाटल्यास) करावे.

अथवा, ज्या ब्राह्मणाने क्षत्रियाला ठार केले आहे, त्याने शहरापासून दूर अंतरावर झाडाखाली तीन वर्षे रहावे व त्या अवधीत सर्व इंद्रियांचे दमन करून व जटा वाढवून ब्राह्मणाला ठार मारल्यानंतर पापक्षालनार्थ जे तपश्चरण करावे लागते ते तपश्चरण करावे.

ब्राह्मणाने वैश्याला ठार मारले असेल तर त्याने पापक्षालनार्थ असले तपश्चरण एक वर्ष करावे व एकशे एक गुरांचे दान करावे. मात्र तो वैश्य शुद्धाचरणी असला पाहिजे.

शूद्राला ठार मारणाऱ्या ब्राह्मणाने सदर त-हेचे तपश्चरण सहा महिने करावे. किंवा त्याने पुरोहिताला दहा पांढऱ्या गाई व एक बैल यांचे दान करावे." (अध्याय ९, श्लोक १२७-१३१).

विष्णुस्मृती

(आ) विष्णुस्मृती

   "खालच्या जातीचा माणूस वरच्या जातीच्या माणसाचा जर अपमान करील अगर त्याला इजा करील तर यासाठी खालच्या जातीचा माणूस आपल्या ज्या अवयवांचा उपयोग करील ते अवयव राजाने तोडून टाकले पाहिजेत.

 

        जर खालच्या जातीचा माणूस वरच्या जातीच्या माणसाबरोबर समानतेच्या भावनेने. बसला तर त्याच्या ढुंगणावर डाग देऊन त्याला हद्दपार करावे.

        खालच्या जातीचा माणूस वरच्या जातीच्या माणसाच्या अंगावर थुकला तर खालच्या जातीच्या माणसाचे दोन्ही ओठ कापून टाकावेत.

        खालच्या जातीचा माणूस जर वरच्या जातीच्या माणसाकडे जाणारा वारा अडवून धरेल तर त्याचे कुल्ले कापून टाकावेत.

        जर त्याने शिवीगाळ (वरच्या जातीच्या माणसाबद्दल) केली तर त्याची जीभ छाटून काढावी.

      नीच जातीत जन्मलेला माणूस वरिष्ठ जातीत जन्मलेल्या माणसाला त्याच्या कर्तव्याबद्दल उपदेश करू लागला तर राजाने त्या नीच जातीतील माणसाच्या तोंडात कढत तेल ओतण्याची शिक्षा द्यावी.

     वरिष्ठ वर्गातील एखाद्या मनुष्याच्या नावाच्या किंवा जातीचा एखाद्या शूद्राने चेष्टेने उल्लेख केला तर तापवून लालबुंद झालेली लोखंडाची सळी त्या शूद्रच्या तोंडात दहा अंगुळे कोबावी." (अध्याय ५, सूत्रे १९-२५).

                             

                               (५)

(अ) बृहस्पती स्मृती

     "जो शूद्र धार्मिक तत्त्वांची शिकवण दुसऱ्याला देईल, किंवा वेदमंत्रांचा उच्चार करील, अथवा एखाद्या ब्राह्मणाचा अपमान करील त्याची जीभ कापून टाकली पाहिजे."(अध्याय १२, श्लोक १२).

 

(ब) गौतम धर्मसूत्र

     "एखादा शूद्र जर स्वेच्छेने वेदमंत्रांचा घोष ऐकत राहिला तर कथिल व लाख यांचे तापवलेले रस त्याच्या कानात ओतावे.

      तो जर वेद वाचू लागला तर त्याची जीभ छाटून टाकावी.

      वेद जर त्याला मुखोद्गत झाले असतील तर त्याला मधोमध उभे चिरून टाकावे."

(अध्याय २०, सूत्रे ४०६)


(क) मनुस्मृती

    जो पैसे घेऊन विद्या शिकवितो, त्याचप्रमाणे जो पैसे देऊन शिकतो, जो शूद्र शिक्षकाचा पेशा करतो व जो अशा शूद्रापासून शिक्षण घेतो, अशा माणसाला देव पितृ यांच्या सन्मानार्थ जे विधी करतात त्या विधीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण देऊ नये.

(अध्याय ३, श्लोक १५६).

 

      शूद्राला कोणी सल्लामसलत देऊ नये. किंवा त्याला देवाला वाहून राहिलेले अन्न अथवा लोणीही कोणी देऊ नये.

       शूद्राला कायदा कानून कोणी शिकवू नये किंवा त्याला धार्मिक विधी करण्याबद्दलची माहिती कोणी देऊ नये, ही आज्ञा जो पाळणार नाही, तो त्या शूद्राबरोबर असमव्रत नावाच्या नरकाच्या घोर अंधारात खितपत पडेल. (अध्याय ४, श्लोक ७८-८१).

         वेदमंत्रांचा घोष अस्पष्टपणे कोणीही करू नये; किंवा वेदमंत्रांचा घोष शूद्रांच्या सान्निध्यात कोणीही करू नये, वेदमंत्रांचा घोष रात्रीपासून सूर्योदयापर्यंत करून थकवा आला तरी कोणी पुनः झोपू नये." (अध्याय ४, श्लोक ९९).

 

                           (६)

   मनुस्मृती

 

           "मनात कोणत्याही प्रकारचा किंतु न आणता ब्राह्मणाने शूद्राच्या वस्तू आपल्या ताब्यात घ्याव्यात. कारण स्वतःची चीजवस्तू शुद्राला नसते. तो गुलाम आहे व त्याची जी काही चीजवस्तू असेल तिच्यावर त्याचा हक्क नसतो, तर त्याच्या धन्याचा. (अध्याय ८,श्लोक ४१७)

        शूद्र धनसंचय करण्यास समर्थ असला तरी त्याने संपत्ती कमवू नये. कारण शूद्राजवळ असलेली संपत्ती पाहिल्याबरोबर ब्राह्मणाच्या चित्ताला वेदना होतात.” (अध्याय १०, श्लोक १२९)

 

                                 (७)

 मनुस्मृतीचा राजाला उपदेश

 

       "स्वतःच्या जन्माच्या आधारे जो आपल्याला ब्राह्मण म्हणवून घेतो किंवा जो स्वतःला कोणत्याही गोष्टींचा आधार न घेता ब्राह्मण म्हणवून घेतो, तो राजाची इच्छा असेल तर, कायदेकानूची घोषणा करील. शूद्राला असली घोषणा करण्याचा कधीही अधिकार नसतो.

     शूद्र न्यायनिवाडा करीत असता राजा जर नुसता त्या शूद्राकडे पाहात राहील तर दलदलीत चिखलात गाय जशी बुडते तसे त्या राजाचे राज्य दुर्दैवाच्या खाईत बुडून जाईल.

ज्या राज्यात शूद्रांचा प्रामुख्याने भरणा आहे आणि ज्यात धर्मलंड लोकांचा बुजबुजाट झालेला आहे व ज्यात द्विज वर्णाचा एकही माणूस नाही असले राज्य दुष्काळ आणि निरनिराळ्या साथी यांच्या तडाख्यांनी समूळ नष्ट होईल." (अध्याय ८, श्लोक २०-0-२२).

                                 (८)

(अ)  आपस्तंब धर्मसूत्र

    पवित्र धार्मिक आदेश पाळण्याच्या बुद्धीने जे घोर तपश्चरणे करतात, ब्राह्मणांचे पाय धुऊन जे शूद्र आपले जीवन घालवितात आणि जे आंधळे, मुके, बहिरे आणि व्याधिग्रस्त आहेत, अशा लोकांना सरकारी कर माफ असावा. (प्रश्न २, पाताळ १०, खंड २६, सूत्रे १४-१६)

    त्रैवर्णिकांची सेवा-चाकरी करणे, हे शास्त्राने विदित केलेले आहे. शूद्र जसजशी उच्च जातीतील माणसांची सेवाचाकरी करील तसतशी त्याला जास्त दर्जाची पुण्याई लाभेल."(प्रश्न १, पाताळ १, खंड १, सूत्रे ७-८)


(ब) मनुस्मृती

    "या विश्वाचे संरक्षण करण्यासाठी देदीप्यमान् देवाधिदेव ब्रह्मदेव याने आपल्या मुखातून, बाहुपासून, मांड्यांपासून आणि पायांपासून जन्म घेतलेल्यांची कर्तव्यकर्मे काय आहेत, याबद्दल वाटणी करून दिली आहे.

     अध्यापन, अभ्यास, यज्ञयाग करणे, पुरोहितपणा करणे, दान देणे व घेणे ही कर्तव्यकर्मे ब्राह्मणाला वाटून दिली.

     जनता संरक्षण, दान करणे, यज्ञयाग करणे, अभ्यास करणे आणि उपभोग्य वस्तूंपासून परावृत्ती ठेवणे ही कर्तव्ये क्षत्रियाला वाटून दिली.

      गुरे पाळणे, दान करणे, यज्ञयाग करणे, अभ्यास करणे, व्यापार करणे, व्याजाने पैसे लावणे आणि शेतकी करणे ही कामे वैश्याला वाटून दिली.

    उपरिनिर्दिष्ट जातींची बिनभोबाट सेवाचाकरी करणे हे एकच काम परमेश्वराने शूद्राला दिले. (अध्याय १, श्लोक ८७-९१).

 

                                (९) 


(अ) आपस्तंब धर्मसूत्र

       "त्रैवर्णिकांतील एखाद्या माणसाने शूद्र जातीच्या स्त्रीशी व्यभिचार केला तर त्याला हद्दपार करावे.

एखाद्या शूद्राने त्रैवार्षिक जातीतील स्त्रीशी व्यभिचार केला तर त्याला देहांताची शिक्षा केली पाहिजे." (प्रश्न २, पाताळ १०, खंड २७, सूत्रे ७-९)


(ब) गौतम धर्मसूत्र

एखाद्या शूद्राने आर्य स्त्रीशी जर जबरी संभोग केला तर त्याचे लिंग तोडून टाकावे आणि त्याची मालमत्ता जप्त करावी.

ज्या आर्य स्त्रीबरोबर शूद्राने जबरी-संभोग केला असेल, तिला जर कोणी पालक असेल तर त्या शूद्राला प्रथम उपरिनिर्दिष्ट शिक्षा भोगू द्यावी व त्यानंतर त्याला ठार मारावे.'

(अध्याय १२, सूत्रे-२-३)


(क) मनुस्मृती

   "एखाद्या शूद्राने सर्वात वरिष्ठ जी जात आहे त्याच जातीतील मुलीच्या (ब्राह्मण मुलीच्या) प्रेमाची याचना केली तर त्याला देहांताची शिक्षा द्यावी. (अध्याय ८, श्लोक ३६६).

   त्रैवर्णिक जातीत जन्मलेल्या स्त्री बरोबर एखाद्या शूद्राने संभोग केला तर त्या स्त्रीला पालक असो वा नसो, त्या शूद्राचे लिंग कापून टाकावे. त्या स्त्रीला पालक असेल तर त्या शूद्राची सर्व मालमत्ता जप्त करावी व त्याला देहांताची शिक्षा द्यावी. (अध्याय ८, श्लोक ३७४ ).

   त्रैवर्णिक जातीत जन्मलेल्या पुरुषांनी पहिल्यांदा त्यांच्या जातीत जन्मलेल्या स्त्रीला लग्नासाठी योग्य म्हणून निवडावी; परंतु त्रैवर्णिक जातीतील जे पुरुष कामांधपणामुळे लग्नाची इच्छा करतात त्यांना खालील जातीतील स्त्रिया लग्नाला योग्य होत.

    शूद्र स्त्री ही शूद्र माणसाचीच बायको होण्यास योग्य आहे; वैश्याला आपल्या जातीतील व शूद्र या जातीतील स्त्रिया यांची बायको म्हणून निवड करता येते. ब्राह्मणाला आपल्या जातीतील स्त्री व वैश्य व शूद्र या जातींतील स्त्रिया यांची बायको म्हणून निवड करता येते.

     ब्राह्मण व क्षत्रिय हे आपत्काळात जरी असले तरी ते शूद्र स्त्रीला बायको करीत नाहीत.

     शूद्र स्त्रीच्या स्वरूपाला मोहून जाऊन त्रैवर्णिक जातीतील जे पुरुष तिला बायको करतात ते आपले कुळ व भावी पिढी यांना शूद्रांच्या अवस्थेला लौकर नेऊन पोहोचवितात.(अध्याय ३, श्लोक १२-१५).

     जो ब्राह्मण शूद्र स्त्री बरोबर संभोग करतो तो नीच अवस्थेला जातो. त्या स्त्रीला त्याच्यापासून मुलगा झाला तर त्याचे ब्राह्मणत्व खरोखर नष्ट होते.

     देव, पितृ आणि अतिथी यांना हव्य-कव्य देऊन त्यांचा सत्कार करणे हे जर शूद्र स्त्रीच्या सर्वस्वी स्वाधीन असेल तर त्या हव्य-कव्याचा देव व पितृ स्वीकार करीत नाहीत व शूद्र स्त्री ज्या त्रैवर्णिकाजवळ आहे त्यालाही स्वर्गप्राप्ती होत नाही.

    शुद्रा स्त्रीच्या ओठावरील धर्मबिंदू जो प्यालेला आहे, तिच्या श्वासोच्छवासाने जो पूर्ण घेरलेला आहे आणि ज्याला त्या शूद्र स्त्रीपासून मुलगा झालेला आहे, अशा माणसासाठी कोणतेही प्रायश्चित सांगितलेले नाही.'" (अध्याय ३, श्लोक १७-१९).

 

                                (१०) 

(अ) वसिष्ठ धर्मसूत्र

 

"वाईट वासना करणे, मत्सर करणे, असत्य बोलणे, ब्राह्मणांबद्दल वाईट रीतीने बोलणे, पाठीमागे निंदा करणे आणि कौर्य ही शुद्रांची लक्षणे होत," (अध्याय ६, श्लोक २४)

(ब) विष्णुस्मृती

 

"ब्राह्मणाच्या मुलाला जे नाव ठेवावण्याचे ते मंगलकारक असावे; क्षत्रियाच्या मुलाला जे नाव ठेवावयाचे ते अधिकारदर्शक असावे, वैश्याच्या मुलाला जे नाव ठेवावयाचे ते संपत्तीदर्शक असावे आणि शूद्राच्या मुलाला जे नाव ठेवावयाचे ते तिरस्कारदर्शक असावे." (अध्याय २७, सूत्रे ६-९).


(क)  गौतम धर्मसूत्र

फक्त एकदाच जिच्यामध्ये मनुष्याचा जन्म होतो अशा चवथ्या जातीत शूद्राचा जन्म होतो. तो वरिष्ठ जातींची सेवाचाकरी करतो. सेवाचाकरीचा मोबदला जो वरिष्ठ जातीकडून मिळेल त्यावर त्याने गुजराण करावी. वरिष्ठ जातीतील लोकांनी वापरून टाकलेले जोडे त्याने घालावेत. वरिष्ठ जातीतील लोकांनी खाऊन जे शिल्लक राहिलेले असेल तेच अन्न त्याने खावे.

  दुष्ट बुद्धीने शिव्या देऊन त्रैवर्णिक जातीतील लोकांची जाणूनबुजून हेटाळणी करणे, किंवा दुष्ट बुद्धीने त्यांना हाणमार करणे, असे वर्तन जे शूद्र करतात त्यांचे अवयव (सदर वर्तन करताना वापरलेले अवयव) छाटून टाकावेत.

       द्विज जातीत जन्मलेल्या माणसाबरोबर समानतेच्या भावनेने बसणे, झोपणे, संभाषण करणे किंवा रस्त्याने चालणे, अंसले वर्तन जो शूद्र करतो त्याला ठार मारावे." (अध्याय १०, सूत्रे ५०, ५८-५९ आणि अध्याय १२, सूत्रे १-७)


(ड) मनुस्मृती

   मुंजीचा विधी होऊन ज्यांना द्विजत्व प्राप्त झालेले आहे, अशा लोकांकडून त्यांच्या इच्छेविरुद्ध जो ब्राह्मण सत्तांधपणाने आणि दुष्ट बुद्धीने गुलामांची कामे जबरदस्तीने करवून घेतो, अशा ब्राह्मणाला राजाने सहाशे पणांचा दंड करावा.

 

   परंतु एखाद्या शूद्राला, मग तो शूद्र गुलाम म्हणून विकत घेतलेला असो व नसो, एखाद्या ब्राह्मणाने गुलामपणाची कामे करावयास भाग पाडले तर त्या ब्राह्मणाला कोणतीही शिक्षा करू नये. कारण ब्राह्मणांची सेवा करण्यासाठीच स्वयंभूत परमेश्वराने शुद्राला जन्माला घातले आहे.

 

धन्याने शूद्राला स्वतःच्या नोकरीतून मोकळे केलेले असले तरी तो शूद्र आपल्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकत नाही. कारण गुलामगिरी ही त्याच्या जन्माची सोबतीण आहे. मग त्याच्यापासून तिला कोण मुक्त करू शकेल? (अध्याय ८, श्लोक ४१२-४१४).

 

जो माणूस सन्मार्गानी आपले आयुष्य चांगल्या रीतीने घालवील किंवा जितके निष्कलंक राखील तितक्या चांगल्या रीतीने त्याला ऐहिक व पारलौकिक सुख मिळेल.

(अध्याय १०, श्लोक १२८).

  नावलौकिक कमावलेले, वेदांचा अर्थबोध जाणणारे आणि कुटुंबवाले जे ब्राह्मण आहेत त्यांची आज्ञा पाळणे हेच शूद्रांचे श्रेष्ठतम कर्तव्यकर्म होय. हे कर्तव्यकर्म करण्यानेच शूद्र आपल्या कल्याणाची तरतूद करून ठेवतो.

   जो शुद्र मनाने निर्मळ राहील, वरिष्ठ जातीतील लोकांची आज्ञा पालन करील , शूद्र सौम्य भाषण करील, घमेंडखोरपणा दाखविणार नाही आणि ब्राह्मणांशी सदैव नम्रतेने वागेल तो पुढील जन्मी उच्च जातीत जन्म घेईल. (पर्याय ९, श्लोक ३३४-३३५).

    उपजीविकेचे काही साधन हाती असावे, अशी इच्छा करणाऱ्या शूद्राने क्षत्रियाची चाकरी करावी किंवा ज्या शूद्राला आपल्या जीवनाचे संगोपन करण्याची इच्छा असेल त्याने श्रीमंत वैश्याची चाकरी करावी.

   ज्या शूद्राला जीवनाचे संगोपन आणि स्वर्गप्राप्ती यांची इच्छा असेल त्याने ब्राह्मणाची चाकरी करावी. कारण तो चाकरी करताना त्याच्याकडून 'ब्राह्मण' हा शब्द वेहोवेळी उच्चारला जाईल आणि त्यामुळे त्या शूद्राला जे काही कर्तव्यकर्म करावयाचे आहे त्याची पूर्ती झाली, असे होईल.

    ब्राह्मणांची सेवा करणे हाच शूद्रांचा उत्तमोत्तम धंदा होय, असे सर्वांचे मत आहे.कारण या व्यतिरिक्त त्याने दुसरा धंदा केला तर त्यामुळे त्याचा काही फायदा होणार नाही.

    जो शूद्र आपली सेवाचाकरी करतो त्याची कुवत, हुशारी आणि कुटुंबस्थिती याबद्दल चौकशी करून त्या मानाने ब्राह्मणांनी आपल्या घरातील वस्तूंतून काही वस्तू त्या शूद्राचे संगोपन करण्यासाठी दिल्या पाहिजेत.

    घरात शिल्लक राहिलेले अन्न, जुने कपडे, कुजके धान्य आणि जुनी लाकडी आसने ही ब्राह्मणांनी आपल्या शूद्र नोकरास द्यावीत. (अध्याय १०, श्लोक १२१-१२५.)

    ब्राह्मणाचा मंगलसूचक, क्षत्रियाचा सत्तासूचक, वैश्याचा संपत्ती सूचक आणि शूद्राचा सेवादर्शक, असा प्रत्येकाचा उत्कृष्ट गुण असावा. (अध्याय २, श्लोक ३१-३२).

    द्विज जातीत जन्मलेल्या माणसाची अत्यंत घाणेरड्या शब्दांची जो विटंबना करतो त्याची जीभ कापून टाकावी, कारण विटंबना करणारा कनिष्ठ जातीचा समजला पाहिजे.

   जर तो द्विज जातीचा उल्लेख अत्यंत अपमानकारक रीतीने करीत असेल तर तापवून लाल केलेली लोखंडाची दहा बोटे लांबीची सळी त्याच्या तोंडात खुपसावी.

    माणूस अहंकाराच्या भरात पुरोहिताला त्याच्या कर्तव्य-कर्माबद्दल काही सूचना देऊ लागला तर राजाने अशा माणसाच्या कानात व तोंडात कडक तापविलेले तेल ओतवावे. (अध्याय ८,श्लोक २७०-७२).

   जर एखादा माणूस आपल्या अवयवाने वरिष्ठ जातीतील माणसाला दुखापत करील तर त्या माणसाचा तो अवयव कापून टाकावा, हा मनूचा दंडक हे.

    जर तो माणूस वरिष्ठ जातीतील माणसावर हात अगर काठी उगारील तर त्याचा हात छाटून टाकावा, आणि रागाने तो जर वरिष्ठ जातीतील माणसाला लाथेने मारील तर त्या माणसाचे दोन्ही पाय छाटून टाकावेत.

    कनिष्ठ जातीत जन्मलेला माणूस वरिष्ठ जातीत जन्मलेल्या माणसाबरोबर बसला तर, त्याच्या ढुंगणावर डाग देऊन त्याला हद्दपार करावे, किंवा राजाने त्याचे ढुंगण कापवावे.

     कनिष्ठ जातीतील माणूस वरिष्ठ जातीतील माणसावर जर मगरूरपणाने थुंकला तर राजाने त्याचे दोन्ही ओठ कापवावेत. त्याने जर वरिष्ठ जातीच्या माणसावर लघवी केली तर त्याच्या शिस्नाचा पुढचा भाग कापवावा, आणि वरिष्ठ जातीच्या माणसावर वाहणारा वारा अडवून धरला तर त्याचे गुदद्वार कापवावे.

     कनिष्ठ जातीतील माणसाने जर वरिष्ठ जातीच्या माणसाचे केस पकडून धरले, तर राजाने काही विचार न करता त्याचे दोन्ही हात कापवावेत; त्याने जर वरिष्ठ जातीच्या माणसाचे पाय, दाढी, मान किंवा दंड पकडले तर त्याचे दोन्ही हात कापवावेत.

     जर एका माणसाने दुसऱ्या माणसाची कातडी फाडली किंवा त्याच्या अंगातून रक्त काढले तर त्याला पाचशे पण दंड करावा; जर त्याने दुसऱ्याचे मांस तोडले तर त्याला सहा निष्कांचा दंड करावा. परंतु जर त्याने दुसऱ्याचे हाड मोडले असेल तर त्याला हद्दपार करावे.

(अध्याय ८, श्लोक २७९-२८४).

नारदस्मृती

(आ) नारदस्मृती

शूद्र जातीत जन्मलेल्या लोकांनी द्विज जातीत जन्मलेल्या आर्य लोकांविरुद्ध जर खोटे आरोप केले तर सरकारी अधिकाऱ्यांनी त्या शूद्र लोकांच्या जिभा मधोमध चिराव्यात आणि त्यांना खोड्यात बसवावे.

        एखाद्या शूद्राने द्विज जातीतील माणसाचा जर घाणेरड्या शब्दांनी अपमान केला तर त्याची जीभ छाटून टाकावी. कारण तो जन्मतःच कनिष्ठ दर्जाचा आहे.

     जर एखादा शूद्र वरिष्ठ जातीतील लोकांची नावे किंवा जाती यांचा उल्लेख तिरस्कार दर्शक शब्द यांनी करीत असला तर तापवून लालबुंद केलेली दशांगुळे लांबीची लोखंडाची कांब त्याच्या तोंडात कोंबावी.

    तो जर ब्राह्मणांना त्यांच्या कर्तव्यकर्माबद्दल आठ्यतेने धडे शिकवू लागला तर राजाने कडक तापविलेले तेल त्याच्या तोंडात व कानात ओतवावे.

    आपल्या ज्या अवयवाने शूद्र ब्राह्मणाला त्रास देईल त्याचा तो अवयव कापून टाकावा. हीच शिक्षा त्याच्या अपराधाला पुरी आहे.

     जो क्षुद्र वरिष्ठ जातीतील माणसांबरोबर त्याच आसनावर बसतो त्याच्या ढुंगणावर डाग द्यावेत व त्याला हद्दपार करावे किंवा राजाने त्याचे ढुंगण कापवावे.

   जो शूद्र अहंकाराच्या भरात वरिष्ठ जातीतील ज्या माणसांच्या अंगावर थुंकतो, त्याचे दोन्ही ओठ राजाने कापवावेत. त्याने जर वरिष्ठ जातीच्या माणसांवर लघवी केली तर त्याच्या शिस्नाचा पुढचा भाग कापावा, त्याने जर वरिष्ठ जातीच्या माणसावर जाणारा वारा थोपवून धरला तर त्याचे कुल्ले कापवावेत. (अध्याय १, श्लोक २२, २७).


Post a Comment

0 Comments