शुद्रांचा दर्जा कोणता,याबद्दलचे ब्राह्मण ग्रंथांंतील प्रमेय (भाग ४)

                    शुद्रांचा दर्जा कोणता,याबद्दलचे ब्राह्मण ग्रंथांंतील प्रमेय (भाग ४)


     रोमन कायदेकानूंच्या अन्वये कोणत्या वर्गाला हक्क प्रदर्शक अधिकार व कोणत्या वर्गाला अपात्रतादर्शक अधिकार देण्यात आले होते. याबद्दल प्रथमतः तुलनात्मक दृष्टीने विचार करू या. रोमन कायदेपंडितांनी मनुष्यांचे पाच वर्ग केलेले होते- (१) अमीर उमराव आणि सामान्य लोक, (२) स्वतंत्र लोक व गुलाम लोक, (३) नागरिक लोक आणि परदेशी लोक, (४) जन्मतःच हक्क मिळविणारे लोक आणि जन्मानंतर काही मार्गांनी हक्क मिळविणारे लोक आणि (4) ख्रिस्ती लोक आणि धर्महीन लोक,

          रोमन कायदेकानूप्रमाणे पुढील लोकांना अधिकार देण्यात आलेले आहे ­– (१) अमीर उमराव, (२) स्वतंत्र लोक, (३) नागरिक, (४) जन्मतः हक्क मिळविणारे लोक आणि (५) ख्रिस्ती लोक. रोमन कायदेकानूप्रमाणे पुढील लोकांना अपात्रतादर्शक अधिकार देण्यात आले होते-(१) सामान्य लोक, (२) गुलाम लोक, (३) परदेशी लोक, (४) जन्मल्यानंतर काही मार्गांनी हक्क मिळविणारे लोक, आणि (५) धर्महीन लोक.

        रोमन कायदेकानू प्रमाणे जो स्वतंत्र माणूस नागरिक समजला जात होता त्याला नागरिक व राजकीय हक्क होते. नागरिक हक्कापासून विवाह आणि व्यापार करण्याचे हक्क मिळत असत. विवाह करण्याचे जे हक्क असत त्यामुळे नागरिक कायदेशीर विवाह करीत असत. असे विवाह केलेल्या नागरिकाला पितृत्वाचे अधिकार मिळत. मृत्युपत्र न करता जो मेलेला असतो अशा नातलगाची स्थावरजंगम मिळकत विवाहित नागरिकाला मिळत असे. रोमन कायद्याप्रमाणे व्यापार करण्याचे जे मार्ग होते ते सर्व नागरिकाला मोकळे होते. निवडणुकीत मतदान करणे आणि एखाद्या अधिकार गाजविण्याच्या जागेचा स्वीकार करणे, असले हक्क रोमन नागरिकाला राजकीय हक्क म्हणून उपभोगता येत असत,

         गुलाम हा आपल्या धन्याची मालमत्ता म्हणून समजला जाई. त्याला कोणत्याही प्रकारचे हक्क उपभोगण्याची शक्यता नव्हती. स्वतंत्र माणूस व गुलाम यांच्या दर्जात जी तफावत आहे ती अतुलनीय आहे..

        परदेशी लोकांना नगरिकत्वाचे हक्क नव्हते म्हणून त्यांना राजकीय किंवा नागरिक हक्क नव्हते. एखादा नागरिक एखाद्या परदेशी माणसाचा पालक असला तर त्या परदेशी माणसाला कायद्याची मदत व संरक्षण मिळू शकत असे.

        जन्मल्यानंतर काही मार्गानी हक्क मिळविणारे जे लोक असतात त्यांचा पालक कोणीतरी असतो. या वर्गात (१) गुलाम, (२) मुले, (३) पत्नी, (४) कोर्टने घनकोच्या स्वाधीन केलेला ऋणको आणि (५) भाडोत्री पेहेलवान यांचा समावेश होतो. या लोकांना (१) स्वतंत्रपणे राहता येत नसे, (२) दुसऱ्याची मालमत्ता मिळू शकत नसे व (३) त्यांच्यावर कोणी अन्याय केला किंवा त्यांना कोणी इजा केली तर त्याबद्दल स्वतंत्रपणे त्यांना त्याची दाद लावून घेता येत नसे.

         पहिल्यांदा रोमन लोक धर्महीन होते. धार्मिक भेदामुळे कोणाला कमी व कोणाला अधिक धार्मिक भावनेच्या कसोटीवर सामाजिक अधिकार व हक्क वाटण्यात आले. जे ख्रिस्ती धर्म पाळू लागले त्यांना हे अधिकार व हक्क देण्यात आले. ख्रिस्ती बादशहांच्या कारकीर्दीत धर्महीन म्हणून जे बडे, निरनिराळ्या पंथाचे लोक होते. त्यातील लोकांवर आणि ज्यू लोकांवर अत्यंत त्रासदायक नियंत्रणे लादण्यात आली. त्यांना वारसा हक्क देण्यात आला नव्हता, तसेच त्यांना (कोर्टात) न्यायालयात साक्षीदार होऊ देत नसत. जे जुन्या मताचे आणि अत्यंत सोवळे ख्रिस्ती होते त्यांनाच सामाजिक हक्कांचा संपूर्ण पणे उपभोग घेता येत असे.

            रोमन कायदेकानूनखाली जे अधिकार व हक्क देण्यात आले होते व अपात्रतादर्शक बंधने निरनिराळ्या लोकांवर लादण्यात आली होती त्यांची थोडीशी माहिती वर दिली आहे, ती लक्षात घेऊन हिंदू लोक असे म्हणतील की, हिंदू धर्मग्रंथात जे अधिकार व हक्क तसेच अपात्रतादर्शक अधिकार सांगण्यात आलेले आहेत त्यांना जगातील इतर देशांत जोड मिळते व रोमन लोकांचे उदाहरण लक्षात घेता हिंदूंचे वरील विधान खरे वाटू लागते. परंतु हिंदू धर्मग्रंथांत सांगितलेली अपात्रतादर्शक बंधने रोमन कायद्याने सांगितलेल्या अपत्रतादर्शक बंधनांपेक्षा अधिक घोर, निर्दय स्वरूपाची आहेत, ही बाब हिंदूंना कबूल करावी लागेल.अपात्र तादर्शक बंधने लादणाऱ्या रोमन कायद्यांची उभारणी काही तत्त्वांवर केलेली आहे.त्याचप्रमाणे अपात्रतादर्शक बंधने लादणाऱ्या हिंदू धर्मग्रंथातील कायद्यांची उभारणी काही तत्वांवर केलेली आहे. या तत्वांची परस्परांशी तुलना केली तर हिंदू धर्मग्रंथातील उपरोक्त तत्त्वे अत्यंत हीन दर्जाची आहेत, हे कोणाच्याही सहज लक्षात येईल. रोमन कायद्यान्वये जे पात्रतादर्शक हक्क व अपात्रतादर्शक बंधने सांगण्यात आलेली आहेत ती कोणत्या पायावर उभारलेली आहेत? रोमन कायद्याचा ज्याने वरवर अभ्यास केलेला आहे असा एखादा माणूस सांगू शकेल की, पात्रतादर्शक हक्क व अपात्रतादर्शक बंधने यांचा पाया (१) मनुष्याचा सामाजिक दर्जा आणि (२) मनुष्याचा कायद्याच्या दृष्टीने असणारा नावलौकिक यावर अवलंबून होता. रोमन कायद्यान्वये मनुष्याचा सामाजिक दर्जा स्वतंत्रता, नागरिकपणा आणि कुटुंबसंबंध या तीन गोष्टींवर अवलंबून असे. स्वतंत्रता या वर्गात स्वतंत्र लोक येत, गुलाम येत नसत. स्वतंत्र माणूस जर रोमन नागरिक असेल तर तो सामाजिक दर्जाचे हक्क भोग शकत असे. कुटुंबसंबंधी या वर्गात काही विशेष दर्जाची कुटुंबे असतात, त्या कुटुंबातील लोकांना काही विशेष प्रकारचे हक्क असत. जो नागरिक या कुटुंबापैकी असे त्याला त्या कुटुंबाचे सर्व हक्क उपभोगता येत असत.

    एखाद्या रोमन गृहस्थाचा सामाजिक दर्जा काही कारणामुळे कमी होत असे, किंवा संपूर्ण नष्ट होत असे. त्याला जर युद्धात कैदी म्हणून पकडून नेले किंवा त्याच्यावर गुलामगिरी लादली गेली तर त्याचे स्वातंत्र्य, नागरिकत्व आणि कुटुंबबंधन ही संपूर्णपणे नष्ट होत असे परंतु तो शत्रूच्या सुटकेतून सुटून परत आला तर त्याला त्याचे स्वातंत्र्य, नागरिकत्व आणि कुटुंबसंबंध ही तिन्ही पुनः परत देण्यात येत असत,

        एखाद्या नागरिकाने स्वतःवर दुसऱ्या राज्याचे नियंत्रण कबूल केले तर त्याचे नागरिकत्व आणि कुटुंबसंबंध याबद्दलचे हक्क नष्ट होत असत; त्याचे वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित राहात असे. अशा परिस्थितीत त्याला इतर नागरिकांबरोबर सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरू देत नसत किंवा त्याला कोणी विस्तव देत नसत. त्याच्यावर असला बहिष्कार घालण्याचा हेतू हा की, त्याने रोमन राज्याच्या बाहेर जाऊन रहावे. तो स्वतः रोमन राज्याच्या बाहेर निघून गेला नाही तर त्याला रोमन साम्राज्याबाहेर हद्पार करण्यात येत असे. एखाद्या माणसाचे कुटुंबसंबंध नष्ट झाले तर त्याचे वैयक्तिक स्वातंत्र्य व नागरिकत्व यांना काही बाधा येत नसे. उदाहरणार्थ, एखादा माणूस दुसऱ्या गृहस्थाच्या पालकत्वाखाली गेला किंवा एखाद्या गृहस्थाने आपल्या मुलाचे पालकत्व सोडले तर त्या माणसाचे किंवा मुलाचे वैयक्तिक स्वातंत्र्य व नागरिकत्व नष्ट होत नसत.

       नागरिकत्व हे प्रथम जन्मावरून मिळत असे. एखाद्या गृहस्थाने कायदेशीर लग्न केले व त्याची पत्नी गरोदर झाली, आणि तेव्हा ते जर नागरिक असेल, त्याच्या पत्नीला जर मुलगा झाला तर त्याला त्याच्या बापाचे नागरिकत्व प्राप्त होत असे. बेकायदेशीर लग्न झालेल्या जोडप्याला जर मूल झाले तर त्या मुलाला त्याच्या आईचे हक्क प्राप्त होत असत. एखाद्या रोमन नागरिकाच्या गुलामाला काही विशिष्ट विधी करून नागरिकत्व देता येत असे. हा नियम पुढे बदलण्यात आला. या बदललेल्या नियमाप्रमाणे गुलामगिरीतून मुक्त केलेला गुलाम काही विधी केल्यानंतर संपूर्णपणे नागरिक होत नसे, तर त्याला परदेशी माणसाचा दर्जा प्राप्त होत असे. जसनियन बादशहाने उपरिनिर्दिष्ट बदललेला नियम नषट केला. त्याने पूर्वीचा नियम चालू केला. या नियमाप्रमाणे गुलामगिरीतून मुक्त केलेला गुलाम रोमन नागरिकत्वाचे सर्व हक्क उपभोगू शकत असे. नागरिकत्वाचे हक्क बहुधा मेहरबानी - खातर देण्यात येत असत. एखादी व्यक्ती किंवा सबंध जात यांना असले हक्क देण्याचा ठराव रोमन लोकांची सार्वजनिक सभा किंवा कायदेमंडळ अथवा रोमन बादशहा मंजूर करीत असत. नागरिकत्वाचे हक्क देण्याची पद्धत आणि अलीकडची परदेशी माणसांना नागरिकत्व देण्याची पद्धत या सारख्या स्वरूपाच्या होत.

        एखाद्याचे नागरिकत्व तीन तन्हेनी नष्ट होत असे. (१) वैयक्तिक स्वातंत्र्य नष्ट झाल्यामुळे, उदाहरणार्थ, एखादा रोमन गृहस्थ युद्धात कैदी म्हणून पकडून नेला गेला तर, (२) एखाद्याने रोमन नागरिकत्व सोडून दिले व दुसऱ्या राज्याचे नागरिकत्व मिळवले तर आणि (३) कोणी काही अपराध केला असेल तर त्याला शिक्षा म्हणून काही दिवस किंवा कायमचेच हद्दपार करणे.

      रोमन कायद्यान्वये एखाद्याला सामाजिक दर्जा असला तर त्याला सर्व सामाजिक व राजकीय हक्क उपभोगता येत असत. म्हणजे त्याला मतदान करता येत असे किंवा त्याला एखाद्या सरकारी पदाचा अधिकार स्वीकारता येत असे. कायद्याच्या दृष्टीने एखाद्याचा दर्ज काय आहे, यावर त्याचे राजकीय हक्क अलंबून असत. ज्याला सामाजिक दर्जा व कायद्याच्या दृष्टीने असलेला दर्जा ही दोन्ही असत त्याला सामाजिक व राजकीय हक्क उपभोगता येत असत. ज्याला फक्त सामाजिक दर्जा असे त्याला फक्त सामाजिक हक्क उपभोगता येत असत. त्याला राजकीय हक्क नसत. ज्याला कयद्याच्या दृष्टीने दर्जा असे त्याला राजकीय हक्क असत.

      कायद्याच्या दृष्टीने असलेला दर्जा दोन त-हेने नष्ट होत असे. वैयक्तिक स्वातंत्र्य नष्ट झाले तर व एखाद्या गुन्ह्याबद्दल शिक्षा झाली तर, वैयक्तिक स्वातंत्र्य नष्ट झाले तर कायद्याच्या दृष्टीने असलेला दर्जा संपूर्णपणे नष्ट होत असे. केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप जसे कमीअधिक गंभीर असेल त्या मानाने गुन्हेगाराला कमी अधिक स्वरूपाची शिक्षा देण्यात येत असे. दिलेली शिक्षा ज्या स्वरूपाची असेल त्या मानाने गुन्हेगाराचा कायद्याच्या दृष्टीने असलेला दर्जा कमी करण्यात येईल. रोमन कायद्याप्रमाणे प्रतिवादीला निरनिराळ्या स्वरूपाची नुकसान भरपाई द्यावी लागत असे, त्याचप्रमाणे त्याचे राजकीय हक्क नष्ट करण्यात येत असत. यामुळे त्याला मतदान करता येत नसे किंवा एखाद्या पदाचा अधिकार स्वीकारता येत नसे.

      रोमन कायद्यान्वये निरनिराळ्या लोकांना जे हक्क दिले होते व काहींवर जे अपात्रतादर्शक निर्बध लादलेले होते याची जी वर माहिती दिली आहे तीवरून दिसून येईल की सदर हक्क व निबंध एकाच पायावर आधारलेले होते. म्हणजे एका जातीचे हक्क एका पायावर व दुसऱ्या जातीचे हक्क निरनिराळ्या पायांवर आधारलेले नव्हते. हीच गोष्ट अपात्रतादर्शक निबंधांबद्दलची, हे हक्क व निबंध अमलात आणण्याच्याअगरन आणण्याच्या काही मर्यादा कायद्याने ठरविलेल्या होत्या. अशाप्रकारची रेखीव व्यवस्था ब्राह्मणी धर्मग्रंथात आढळत नाही. अधिकार, हक्क व अपात्रतादर्शक निबंध यांची उभारणी जातीय पायावर केलेली आहे, असे ब्राह्मणीधर्मग्रंथांवरून दिसून येते. एवढेच नव्हे तर, सर्वप्रकारचे अधिकार व हक्क त्रैवर्णिक जातींना देण्यात आलेले आहेत व सर्वप्रकारचे अपात्रतादर्शक निबंध फक्त शूद्र जातीच्या वाट्याला टाकलेले आहेत. हे ब्राह्मणी धर्मग्रंथांचे वैशिष्ट्य आहे..

     वरील स्तंभात मांडलेले विचार ब्राह्मणी धर्मग्रंथाला मानणारे लोक मान्य करणार नाहीत, रोमन कायद्यान्वये अधिकार, हक्क व अपात्रतादर्शक निबंध यांची उभारणी जातीय पायावर केलेली आहे, असे ते प्रतिपादन करतील. त्यांचे हे म्हणणे अमीर-उमराव लोक व सामान्य लोक यांच्या बाबतीत खरे आहे. तथापि इतर बाबतीत त्यांचे म्हणणे खरे ठरत नाही; हे पुढील विवेचनावरून दिसून येईल.


Post a Comment

0 Comments