पहिल्या प्रथम हे लक्षात ठेवले पाहिजे की सामान्य लोक हे गुलाम नव्हते. त्यांना सामाजिक व राजकीय हक्क असत. त्यांच्याकडून काही स्वरूपाचे गुन्हे झाले तर त्या हक्कात फेरबदल होत असत. परंतु ते फेरबदल कायमच्या स्वरूपाचे नसत. सामाजिक बाबतीत त्यांच्यावर दोन निर्बंध होते. अमीर-उमरावाच्या मुलामुलीची त्याच्या मुला मुलींची लग्ने बेकायफा ठरविलेली होती. हा सामान्य लोकांवरील निर्बंध इ.स. पू. ४४५ मध्ये करण्यात आला. या बाबतीत जो कायदा करण्यात आला त्यान्वये अमीर-उमराव व सामान्य लोक यांचे विवाह कायदेशीर ठरविण्यात आले. सामान्य लोकांवर दुसरा एक निर्बध होता. या निर्बंधान्वये सामान्य लोकांना रोमच्या देवळात पुरोहित आणि धर्माधिकारी होता येत नसे. हा निर्बंध इ.स. पू. ३०० मध्ये दूर करण्यात आला.
अमीर-उमराव लोक व सामान्य लोक हे राजकीय हक्कांच्या बाबतीत
समानतेच्या भूमिकेवर कसे आले याचा थोडासा इतिहास वर सांगितला.
पात्रतादर्शक अधिकार व अपात्रतादर्शक अधिकार यांची विभागणी
रोमन कायद्याने जातीय पायावर केलेली होती असे जरी गृहीत धरले तरी हे लक्षात ठेवले
पाहिजे की, सामान्य लोकांवर
अपात्रतादर्शक असे जे निर्बंध लादलेले होते ते कायमचे नव्हते. ते निबंध काही काळ
अस्तित्वात होते, पण ते कालानुक्रमे
नाहीसे झाले. ही वस्तुस्थिती लक्षात घेतल्यानंतर ब्राह्मणी धर्मग्रंथाला उचलून
धरणाऱ्या लोकांना हे कबूल करावे लागेल की, हक्क, अधिकार आणि निबंध
यांची वाटणी, ब्राह्मणी
धर्मग्रंथ प्रमाणे, रोमन कायद्याचीही
जातीय पायावर केलेली आहे. हे मत सपशेल चुकीचे आहे. रोमन कायद्यात अमीर लोक व
सामान्य लोक यांच्यामधील सामाजिक व राजकीय बाबतीत भेद नाष करून त्यांना एका
पायरीवर आणून ठेवले. त्याप्रमाणे, त्रैवर्णिक जाती व शूद्र जात यांच्यात असलेले भेद ब्राह्मणी धर्मग्रंथकरांनी
नष्ट करून त्रैवर्णिक जाती व शूद्र यांना एका समान पायरीवर आणून का सोडले नाही? या प्रश्नाचे उत्तर देण्याची जबाबदारी ब्राह्मणी
धर्मग्रंथांना उचलून धरणाऱ्या लोकांवर आहे.
याशिवाय ब्राह्मणी कायदे व रोमन कायदे यांच्यात असलेला एक विशेष स्वरूपाचा फरक आहे. तो म्हणजे अपात्रतादर्शक निर्बंध नष्ट करण्याबद्दलचा. रोमन कायद्याने निर्माण केलेले निर्बंध कायम स्वरूपाचे नव्हते. काही विशिष्ट परिस्थिती अस्तित्वात असेपर्यंत त्या निबंधांची अंमलबजावणी होत असे. ती विशिष्ट परिस्थिती नष्ट झाली की ते निर्बंध आपोआप नष्ट होत असत आणि निर्बंध नष्ट झाले की ज्यावर ते लादण्यात आलेले होते त्या माणसाला आपली स्वत:ची प्रगती घडवून आणून समाजात मानाचा दर्जा प्राप्त करून घेण्यास मोकळीक मिळत असे. ज्या विशिष्ट परिस्थितीमुळे निर्बंध अस्तित्वात आले ती परिस्थिती कायम स्वरूपाची रहावी, अशी खटपट रोमन कायद्याने कधीच केले नाही. उलटअंशी ज्या परिस्थितीवर निर्बंध टिकून रहात ती परिस्थिती दूर करण्याचे रोमन कायद्याने प्रयत्न केले व ते प्रयत्न अयशस्वी झाले. ही गोष्ट सामान्य लोक, गुलाम, परदेशी लोक आणि धर्महीन लोक यांना रोमन कायद्याने जे वेळोवेळी निरनिराळे हक्क दिले, त्यावरून दिसून येते.
रोमन कायद्याने अपात्रतादर्शक निर्बंध प्रथम जरी काही लोकांवर लादले तरी ते त्यांनीच कालांतराने नष्ट केले. धर्मसूत्रे व स्मृती यांनी शूद्र लोकांवर अपात्रतादर्शक निर्बंध एकदा जे लादले ते कायमचेच, त्या निर्बंधांत कधीकाळी काही फेरफार करावा, अशी त्यांनी मुळीच तरतूद केलेली नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर धर्मसूत्रे व स्मृती यांनी शूद्रांनी कायमचेच गुलामगिरीत खितपत पडावे, अशी जी तरतूद केलेली आहे ती किती अमानुष आहे, हे कळून येईल. याहीपेक्षा कठोर कसाईकरणी धर्मसूत्रे आणि स्मृती यांनी केलेली आहे. ती ही की, शूद्रांवर जे निर्बंध लादलले आहेत ते कोणत्या रीतीने पाळावेत, याबद्दलच्या काही अटी सांगितलेल्या आहेत, या अटीला बाधक असे जर कोणी काही कृत्य केले तर ते कृत्य गुन्हेगारीचे ठरविलेले आहे व त्या गुन्ह्याबद्दल जबरदस्त शिक्षा सांगितलेली आहे. उदाहरणार्थ, वैदिक मंत्र म्हणण्याची शूद्राची योग्यता नाही म्हणून त्याला वैदिक यज्ञ करण्याचा अधिकार नाही. धर्मसूत्रांनी हा जो निर्बंध घातलेला आहे तो फारसा घातक नाही व त्याबद्दल कोणी निषेधही करणार नाही. परंतु धर्मसूत्रांनी या निर्बंधापेक्षा भयंकर घातक असे दूसरे निर्बंध लादलेले आहेत. वेदाध्ययन करणे किंवा वेदमंत्राचे घोष ऐकणे, हे शूद्राला निषिद्ध आहे व हे कृत्य गुन्हेगारीचे आहे. शूद्राने वेदाध्ययनाचा गुन्हा केला तर त्याची जीभ तोडावी आणि त्याने वेदमंत्राचे घोष ऐकले तर त्याच्या कानात तापवून वितळलेल्या शिसाचा रस ओतावा. शूद्राने आपल्यावरील निर्बंध झुगारून देण्यास धडपडू नये, म्हणून त्याला जबरदस्त दहशत घालण्यासाठीच धर्मसूत्रांनी वरील प्रकारच्या रानटी शिक्षा शूद्रांना सांगितलेल्या आहेत.

0 Comments